पुणे : ‘जेव्हा समाजामध्ये स्त्रीकडे एक भोगवादी वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता, स्त्रियांसाठी शिक्षणाचे सर्व मार्ग बंद होते, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाची ज्योत पेटवून त्यांना सामाजिक प्रवाहात आणले. स्त्रियांचा आवाज बनून त्यांनी स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा विचार दिला. सावित्रीबाई या खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या कैवारी होऊन स्त्रीमुक्तीच्या शिल्पकार ठरल्या,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले.
भोसरी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एकविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात प्रकाश पगारिया व्याख्यानमालेत ‘स्त्री मुक्तीच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले’ या विषयावर डॉ. धोंगडे यांचे व्याख्यान झाले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि भगवान महावीर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी संमेलनाध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, मुख्याध्यापिका मेघना जोशी, सुलभा निवंगुणे आदी उपस्थित होते. नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर व सुलभा निवंगुणे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, ‘सामाजिक परिवर्तन हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे ध्येय होते. त्यांचे हे ध्येय सावित्रीबाई फुले यांनी सत्यात आणले. शिक्षणाने परिवर्तन होते, हे त्यांनी जाणले. त्या जोतिबा फुले यांच्या सावली बनल्या नाहीत, तर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी कार्य केले. या सामाजिक योगदानाने स्त्रियांच्या सामाजिक जीवनाचे चित्र बदलून गेले. स्त्री शिक्षण, बालहत्या, सतीप्रथा प्रतिबंध करण्यासह दुष्काळ भागात अन्नछत्रासारखी विविध कामे त्यांनी केली. सावित्रीबाई खंबीर मनाच्या होत्या. कोणावरही अवलंबून न राहता त्या अनुभवातून घडल्या. समाजातील विरोध झुगारून बंडाचे निशाण त्यांनी हाती घेऊन स्त्री-मुक्तीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले.’
या सत्राचे निवेदन संगीता झिंजुरके यांनी केले. आभारप्रदर्शन मधुश्री ओव्हाळ यांनी केले. पुढील वर्षी होणाऱ्या २२व्या बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कविवर्य चंद्रकांत वानखेडे यांची निवड करण्यात आल्याचे बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी जाहीर केले.